महाराष्ट्रात गेल्या २०० वर्षात साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी केलेल्या व साहित्यला नवे वळण देणाऱ्या आणि नवी रुजवात करणाऱ्या ४९८ चरित्र नायकाची चरित्र यात आहेत. महाराष्ट्रातील साहित्यिक घडामोडी, साहित्यची जडणघडण व साहित्यिकांचा परामर्ष घेणारे कोश उपलब्ध असतात. परंतु निव्वळ साहित्यिकांचा चरित्र विषयक तपशील नमूद करणारा व त्यांच्या साहित्यिक कार्यावर नेमकेपणाने भाष्य करणारा हा खंड आहे. साहित्यिक आणि साहित्य प्रकार यांच्या आधारे साहित्य विषयक अभ्यास करणाऱ्या मंडळीचा याने निश्चितच फायदा होणार आहे आणि हेच या कोशाचे वेगळेपण आहे. संदर्भमूल्य व माहिती दृष्ट्या परिपूर्णता हे या खंडाचे वेगळेपण आहे. एकंदर कोशाकडे निरास, रटाळ व कंटाळवाणा साहित्य प्रकार म्हणून पाहण्यची भावना अभ्यसकांची नसली तरी प्रथमच कोश हाताळणाऱ्या नव्या पिढीतील विद्यार्थांना तसे वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे असे वाटणाऱ्या लोकांनाही हा कोश आकर्षक वाटेल, त्याची रचनाही नेत्र सुखद वाटेल ह्याची काळजी घेतलेली आहे. कोश हा प्रत्येक भाषेच्या दृष्टीने महत्वाचा असतो. भाषेतील साहित्य जिवंत ठेवण्याचे कार्य कोश करीत असतो. त्यामुळे प्रत्येक वाचकाने, साहित्य प्रेमीने आणि अभ्यासकाने कोश संग्रही ठेवायला हवेत. सदर खंडाच्या लेखनासाठी महाराष्ट्रभरातून ११२ लेखकांनी योगदान दिले आहे. तर डॉ. विलास खोले यांची प्रदीर्घ अशी प्रस्तावना लाभलेली आहे. या कोशाचे संपादन डॉ. सुभाष भेंडे यांनी केलेले आहे.
|